‘२०२४ च्या आधी भाजपा फुटलेली असेल’; ठाकरे गटातील नेत्यांचा दावा
![Sanjay Raut said that BJP will be split before 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/uddhav-thackeray-2-780x470.jpg)
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. लोकसभा निवडणुकासांठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, सनातन धर्माचं कुणीही समूळ उच्चाटन करू शकत नाही. एआयएडीएमके भाजपासोबत होती. पण त्यांचीही भूमिका सनातन धर्मविरोधी आहे. सनातन धर्म जगभरात कायम राहील. मोदींना सनातन धर्माची चिंता करण्याची काहीही गरज नाही. भाजपानं सनातन धर्माच्या निर्माण व संरक्षणाचा ठेका घेतलेला नाही. इथे शिवसेना बसली आहे. त्यासाठी मोदींची गरज नाही.
हेही वाचा – एल्विश यादववरून जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हा महाराष्ट्राचा अपमान!
हा निवडणुकीचा मुद्दा नाही. आत्तापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची चिंता नव्हती. आता अचानक चिंता वाटायला लागली आहे. २०२४ साठी भाजपा व मोदींकडे काहीही मुद्दा नाही. बेरोजगारी, महागाई, चीनची घुसघोरी, जम्मू-काश्मीर, कॅनडाचे आरोप हे मुद्दे महत्वाचे आहेत. पण भाजपा सनातन धर्मावरच बोलत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाच्या नेतृत्वाखाली सध्याची एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. मग त्यांनी लोक गोळा केले व दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. कोण आहेत एनडीएमध्ये? शिवसेना, अकाली दल नसेल तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकदच शिवसेना व अकाली दल होती. बाकीचे लोक येतात आणि जातात. २०२४च्या आधी भाजपाही फुटलेला असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.