‘नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याबरोबर असले तरी..’; संजय राऊतांचं सूचक विधान

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. पुढच्या एक ते दोन दिवसांत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याबरोबर असले तरी उद्या आमच्याबरोबर येतील, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, एनडीएचं सरकार चालवताना नरेंद्र मोदी यांचे नाकीनऊ येतील. मुळात एनडीएमध्ये आहेच कोण? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. आता हे दोघेही सर्वांचे आहेत. म्हणजे आज ते तुमच्याबरोबर आहेत. उद्या आमच्याबरोबर असतील. आताच नितीश कुमार यांच्या पक्षाने मोदी सरकारच्या अग्निवीर भरतीला विरोध केला आहे. मोदींनी जे मुद्दे प्रचारात आणले होते, त्याला हे लोक विरोध करत आहेत. हे उद्या राम मंदिरालाही विरोध करतील. चंद्राबाबू नायडू हे म्हणत होते की, आम्ही सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना आरक्षण देणार, असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होण्याची बाकी आहे. पण खरं तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवलं आहे.
हेही वाचा – राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कानशिलात लावल्याची घटना समोर आली होती. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, काही लोक मत देतात आणि काही लोक थप्पड देतात. याबाबत मला जास्त माहिती नाही. मात्र, जर सुरक्षारक्षक महिलेने सांगितलं की त्यांची आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात होती. पण काहीजण त्यांच्याबाबत चुकीचं विधान करत असतील तर हे चुकीचं आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक महिलेला संताप आला असेल. महिला सुरक्षारक्षकाने त्यांच्या आईसाठी कायदा हातात घेतला. मात्र, कंगना रणौत या सध्या खासदार आहेत. त्यामुळे एका खासदारावर अशा प्रकारे हात उचलणं योग्य नाही, असंही संजय राऊत म्हणाले.





