‘समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे’; बस अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
![Sanjay Raut said Samriddhi Highway is a cursed highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई : समृद्धी महामार्गावर बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याकडे ही बस येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. ज्या पद्धतीने हा महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय घेतले ते भविष्यात समोर येतील. पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही. कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या.
आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली होती. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात. भ्रष्टाचारातून हा रस्ता तयार झाल्याचं मला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत
झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.