संजय राऊतांचा पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटला आहे. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी आम्ही देशासोबत ही भूमिका घेतली आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गायब झाले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत यामागील कारण सांगितले.
संजय राऊत यांनी चार ते पाच दिवसांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गैरहजेरीचे कारण सांगितले.
हेही वाचा : “पीसीएमसी @५०” उपक्रमांतर्गत 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण
मी गेले ४ ते ५ दिवस नव्हतो. राज्यात शांतता नांदावी असं मला वाटत होतं, असे संजय राऊतांनी म्हटलं. पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये. राजकारण कोण करतंय, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाजमाध्यमांवर याचं राजकारण करत आहेत. हा हल्ला झाल्यावर २४ तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. एक सैनिक किंवा नागरिक मारला गेला तर अमेरिका, इस्त्रायल आणि रशियासारखी राष्ट्र जी स्वत:ला बलवान समजतात किंवा ५६ इंचाची छाती वाले समजतात. ते ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केलं, पण पाणी असं बंद होत नाही, असे संजय राऊत म्हणाले.