‘मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन केल्यास मराठा आरक्षण टिकेल’; संभाजीराजे छत्रपती
![Sambhaji Raje said that Maratha reservation will survive if Backward Classes Commission is re-established](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sambhaji-Raje-780x470.jpg)
पुणे : मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना हा समाज पुढारलेला आहे. मागास नाही, असे नमूद केले होते. त्यामुळे या परिस्थितीत आरक्षण कसे देता येणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तीन टप्पे महत्त्वाचे आहेत. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे प्रथम सिद्ध करावे लागेल.
हेही वाचा – राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! राजेंद्रसिंह गुढांचा शिंदे गटात प्रवेश
त्यानंतर मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन करावा लागेल आणि मराठा समाजाचे सर्वेक्षण करावे लागेल, या तीन गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच मराठा आरक्षण टिकेल. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिलेला अहवाल अचूक आणि महत्त्वाचा आहे. सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारला यासंदर्भात पत्रव्यवहार करून विचारणा केली. मात्र त्याचे उत्तर देण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समन्वय समितीने काय केले, असं संभाजीराजे म्हणाले.
अध्यादेश काढून देण्यात आलेले आरक्षण टिकणार नाही. या पद्धतीने आरक्षण दिले तर ती मराठा समाजाची फसवणूक ठरेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाबाबत जास्त माहिती आहे. मात्र गेले दीड वर्षे ते गप्प का बसले, असा प्रश्नही संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला.