मतदानाआधीच निकाल! राज्यसभेच्या 14 जागा बिनविरोध; मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का, BJP ने किती जागा जिंकल्या?

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमधील एकूण 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाचे 10 आणि काँग्रेसच्या 4 नावांचा समावेश आहे. उमेदवारांसमोर कोणतेही प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची निवडणूक लढतीशिवायच निश्चित झाली. या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
कर्नाटकमधील चार राज्यसभा जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. खर्गे यांच्याशिवाय काँग्रेसचे मन्सूर अली खान आणि पवन खेडा यांनाही विजय मिळाला, तर भाजपचे एम. नागराज हेही राज्यसभेवर निवडून गेले.
राज्यातील चार विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 25 जून रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे इरन्ना कडाडी आणि नारायण कोरागप्पा, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते एच. डी. दैवगोडा यांचा समावेश होता.
गुजरातमधील चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला. निवडणूक आयोगाने राजुभाई शुक्ला, मुकेशभाई राठवा, मानसिंह परमार आणि जितेंद्रभाई मेघजीभाई कजारिया यांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – नाशिकसोबत आता जळगावचा देखील प्रश्न सुटला, महाजन यांनी स्पष्ट केले…
मध्य प्रदेशातील तीन जागांवर भाजपचे तरुण चुघ, रजनीश अग्रवाल आणि महेश केवट यांची बिनविरोध निवड झाली. सुरुवातीला चार उमेदवार रिंगणात होते. मात्र काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान फेटाळण्यात आल्याने भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.
या जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार होते. मात्र तीन जागांसाठी केवळ तीनच वैध उमेदवार उरल्याने मतदानाची गरज भासली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिन्ही उमेदवारांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
राजस्थानमधूनही तीन उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अन्य कोणताही उमेदवार रिंगणात न उरल्याने भाजपचे सतीश पूनिया आणि अलका गुर्जर तसेच काँग्रेसचे नीरज डांगी यांना विजयी घोषित करण्यात आले.
राज्यसभा निवडणुकीतील या बिनविरोध विजयांमुळे भाजपने अनेक राज्यांत आपले संख्याबळ मजबूत केले असून काँग्रेसलाही काही महत्त्वाच्या जागा राखण्यात यश आले आहे.





