पुण्यात लाचार होऊन युती करू नका; रवींद्र धंगेकरांची ठाम भूमिका

Ravindra Dhangekar | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी पक्षांमधील युतीवरून वातावरण तापले आहे. महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिवसेना-भाजप युती होईल, असे संकेत दिले होते. त्यानुसार बैठका आणि चर्चा सुरू झाल्या असल्या तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. पुण्यात लाचार होऊन युती करू नका, एवढेच मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनांचा उद्रेक झाला, त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे, फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, या हेतूने आमचं शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यानंतर उदय सामंत यांना भेटलो, जर पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर भाजपाने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपाही निवडून आलेली नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचाराचा ‘‘श्रीगणेशा’’
आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमच्या पक्षाचे उमेदवार आम्हीच ठरवणार, तर त्याउलट आमचे उमेदवार पण तेच ठरवणार, जागा देखील तेच ठरवणार, असं असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत, यामध्ये नेत्यांना तोंड द्यावे लागणार आहे, आम्ही काल एकनाथ शिंदेंना सांगितलं आहे, अशा प्रकारची युती करणे घातक आहे, शेवटी जर तुमच्या जागा निवडून येणार नसतील तर, तर तुम्हाला युतीचा फायदा काय आहे, त्यापेक्षा आपण आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे, आपण सांगितल्याप्रमाणे, कालच मी चर्चेतून ऐकले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने शिवसेनेची बोलण्याची तयारी दर्शवली आहे, शेवटी कार्यकर्त्याच्या भावना या ओळखून पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. लाचार होऊन युती करायची नाही. सन्मानाने युती करायची. लाचार होऊन आम्हाला युती नको. आमचं रक्त हे भगवं आहे. आम्हाला सन्मानाने निवडणूक लढवू दिली नाही तर आम्हाला निवडणूक लढवू देण्याची संमती द्यावी. एकनाथ शिंदेंची साथ मी कधीही सोडणार नाही. माझ्या मुलाने मला सांगितलं की तुम्ही तुमचं बघा. त्याने अपक्ष लढायचं ठरवलं आहे. पण मी शिवसेनेचा प्रचार आहे. जे होईल त्याचा निर्णय तो घेईल, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.





