‘अजित पवारांमुळे आमची ताकद कमी झाली’; रामदास कदम यांची टीका

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचा (अजित पवार) समावेश असलेल्या महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन खलबतं सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवार यांना लक्ष केले जात आहे. २०२३ साली अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले होते, तेव्हाही आमच्या लोकांना मंत्रिपद मिळाले नाही, अशी टीका रामदास कदम यांनी अजित पवारांवर केली आहे.
रामदास कदम म्हणाले, की भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस आणि आमच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. अजित पवार हे तर शरण गेले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली, हा भाग वेगळा. मुख्यमंत्रीपदावरून कुणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहणार आहे.
हेही वाचा – पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. आता झुकते माप कुठे टाकायचे, हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे, असंही रामदास कदम म्हणाले.





