‘नवे मित्र मिळताच, जुन्यांना विसरु नये’; रामदास आठवलेंचं विधान
![Ramdas Athawale said that while making new friends, one should not forget the old ones](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ramdas-Athawale-780x470.jpg)
पुणे | लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीय. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतांना आरपीआय रामदास आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिर्डी लोकसभा स्वत: ला तर सोलापुर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी सोडण्याची मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, शिर्डी मधून आपण स्वतः आणि सोलापूर मधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे,जागा मिळणे हा आमचा हक्क आहे, जनता आम्हाला विचारत आहे. आम्हाला दोन जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद आहेत का? नितीन गडकरी म्हणाले..
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जरी राहुल गांधींच्या न्याय जोडो यात्रेच्या समारोपाला हजर राहिले असले, तरी महाविकास आघाडी मध्ये सहभागी होतील असे वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेणार ही नाही, तसेच प्रकाश आंबेडकर जर मोदींच्या विरोधात असतील तर मी मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.