‘मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही’; रामदास आठवलेंचं विधान

Ramdas Athawale | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बरोबर घेण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. तसेच, जिथे जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना बरोबर घेऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.
रामदास आठवले म्हणाले, की माझ्याकडे जवळपास शंभर लोकांची नावं आली होती. आम्ही म्हणत होतो की आम्हाला १० ते १२ जागा द्या. पण तेव्हा १० ते १२ जागा मिळणं अशक्य आहे असं मला वाटलं तेव्हा मी म्हटलं की आम्हाला ४ ते ५ जागा द्या. आम्ही महायुतीला सोडणार नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीवेळी महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून आले आणि लगेच त्यांना महायुतीत परभणीची जागा सोडली. मग मी शरद पवार यांना भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा महायुतीत मिळाली असती. पण मी तसं केलं नाही.
हेही वाचा – शिरुरचे खासदार अभिनेता डॉ. अमोल कोल्हे आता मतदार संघात ‘मिस्टर इंडिया’च्या भूमिकेत!
आम्हाला (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला) मंत्रिपद मिळतं की नाही हे माहिती नाही. त्यामुळे कोणत्याही खात्याचा विषयच नाही. राज ठाकरेंची हवा निवडणुकीत गेली आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत माझ्याशिवाय सरकार येणार नाही अशा स्वप्नात होते. पण त्यांचं स्वप्न भंग झालं. राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक फक्त त्यांच्या सभा ऐकायला येतात आणि निघून जातात, मतदान देत नाहीत. राज ठाकरे महायुतीत येतील असं वाटत नाही. पुढे काय निर्णय होणार? हे मला माहिती नाही. पण महायुतीत त्यांना घेण्यास फायदा नाही. मी महायुतीत असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय? असं रामदास आठवले म्हणाले.