मणिपूर हिंसाचारवर राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, ठोस पावलं उचला..
![Raj Thackeray's letter to PM Modi on Manipur violence](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/raj-thackeray-4-780x470.jpg)
मुंबई : मणिपूर राज्यात मैतई आणि कुकी समाजातील वादातून दंगली सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात कद्रसरकारला अपयश का येतंय है कळत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह है चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – Pimpri : शाळेच्या कामामुळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, रुग्णांची गैरसोय
https://twitter.com/RajThackeray/status/1675128157639438337
असो, मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल है पाहा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.