‘ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा’; राज ठाकरेंची बस अपघातावर प्रतिक्रिया
![Raj Thackeray said that pressure should be placed on them](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/raj-thackeray-3-780x470.jpg)
मुंबई : समृद्धी महामार्गावर बसच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याकडे ही बस येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
हेही वाचा – समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ जणांचा मृत्यू
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1675026940313362432
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत
झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.