‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

Actor Rahul Solapurkar | बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा वाद सुरु आहे. अशातच मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडा वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खून व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.
हेही वाचा : भारत वि. इंग्लंड चौथी टी-२० लढत आज पुण्यात रंगणार; जाणून घ्या कधी व किती वाजता
दरम्यान, अभिनेता किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणार्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले. अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का??? कडेकोट बंदोबस्तात तुरूंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते इव्हिएम घोटाळ्यानं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय? अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.





