भारताने कोणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवणार? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची मुभा दिल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. याच मुद्द्यावरून काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सवाल उपस्थित करत, “भारताने कोणाकडून तेल खरेदी करायचं हे अमेरिका का ठरवणार?” असा प्रश्न उपस्थित केला.
राहुल गांधी म्हणाले, की मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये हे युद्ध सुरू आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जागतिक तेलाचा २० टक्के पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो ती होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः भारतावरही परिणाम होत आहेत. कारण आपल्याला लागणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा खूप मोठा भाग हा होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने येतो. भारतातील अनेक शहरांत सध्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे, तसेच अनेक रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच एलपीजी गॅसबाबतही भिती आहे, ही फक्त सुरुवात आहे.
हेही वाचा : वर्गातील मशीन लर्निंगपासून उद्योगातील एआयपर्यंतचा प्रवास
उर्जा सुरक्षेचा प्रश्न हलक्यात घेण्यासारखा विषय नाही. कारण ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक देशाचा पाया हा त्याची ऊर्जा सुरक्षा आहे. आपण कोणाकडून तेल खरेदी करतो, कोणाकडून गॅस खरेदी करतो आणि आपण रशियाकडून तेल खरेदी करू शकतो का? हे ठरवण्याची परवानगी अमेरिकेला देणं चुकीचं आहे. आपण वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी आपले संबंध निश्चित करू शकतो. भारतासारखा मोठा देश दुसऱ्या देशाला, दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आपण रशियन तेल खरेदी करावं की नाही? हे ठरवण्याची परवानगी का देईल? असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.





