राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले, ते माफी मागणार नाही; विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांतील निवडणुकांमध्ये मतचोरी झाली असा दावा केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भातील काही पुरावेही सादर केले. या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत राहुल गांधींना ज्या मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली किंवा जोडली गेली आहेत, त्यांची सविस्तर माहिती आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जर ठोस पुरावे दिले नाहीत, तर राहुल गांधींनी आपल्या आरोपाबाबत माफी मागावी लागेल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, की देशात मतचोरी होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत पुरावे दिले, यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पण त्यात राजकीय भूमिका दिसली. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोगाने उत्तर दिली नाही. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्र लिहिली पण आयोग त्याला उत्तर देत नाही उलट राहुल गांधी यांच्याकडे पुरावे मागत आहे, हे गजब आहे. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले, ते माफी मागणार नाही असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट
मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
ज्वारी,कपाशी ,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान झाले आहे. अकोला, यवतमाळ ,वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा फटका बसला आहे. हजारो एकर वरील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अतिवृष्टीचे गेल्यावेळेचे पैसे अजून सरकारने दिले नाही त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांच्या हाताचे पिक गेले आहे. एकीकडे सरकार कर्ज काढत आहे आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने गरज पडली तर अजून कर्ज काढावे पण त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली.





