कालिदासावरील चित्रपटाच्या निर्मितीने नागपूरमधील तिसऱ्या चित्रसृष्टीला चालना

मुंबई : महाकवी कालिदास यांच्यावरील चित्रपटाच्या चित्रीकरणाने नागपूरमध्ये रामटेक येथे साकारल्या जाणाऱ्या तिसऱ्या चित्रसृष्टीला चालना दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रामटेकमधील रामसृष्टी आणि कालिदास चित्रसृष्टीची घोषणा केली होती. विदर्भातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच येथील कला आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी १०० हेक्टर जमिनीवर ही तिसरी चित्रसृष्टी साकारली जाणार आहे. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी महाकवी कालिदास यांच्यावरील चित्रपटाची घोषणाही केली होती. या चित्रपटाच्या निर्मितीने या तिसऱ्या चित्रसृष्टीला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे वित्त व नियोजन मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. दिवाळीत या चित्रपटाच्या निर्मितीचा श्रीगणेशा केला जाईल. त्याकरिता उभारला जाणारा सेट हा चित्रिकरणानंतर कायमस्वरूपी पर्यटकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हेही वाचा – गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचा शिक्षक अभिमुखता कार्यक्रम ( Teacher’s Orientation ) उत्साहात संपन्न
आशिष जयस्वाल यांनी नुकतीच गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट देत येथील सुविधांची माहिती घेतली. गोरेगाव, कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ यांच्या धर्तीवर नागपूरमधील चित्रसृष्टी साकारली जाणार आहे. यावेळी चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्याशी जयस्वाल यांनी नागपूर चित्रनगरीच्या आराखड्यावर चर्चा केली. आधुनिक चित्रपटी निर्मितीची तंत्रे, व्हिएफएक्स इफेक्ट्स, गेमिंग, डिजिटल मिडिया, सांस्कृतिक पर्यटन यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश नागपूर येथील प्रकल्पात केला जाणार आहे. त्यासाठी येथील बॉलिवूड पार्क, फेम स्टुडिओ, अत्याधुनिक शुटिंग फ्लोअर्स, व्हर्च्युअल रिअ’लिटी अनुभव केंद्र तसेच पर्यटकांकरिता विकसित करण्यात आलेल्या सुविधा यांची पाहणी त्यांनी केली.
महाराष्ट्राने देशाला चित्रपटसृष्टी दिली. परंतु आता या उद्योगाचा विस्तार राज्यातील प्रत्येक भागात करण्याची गरज आहे. विदर्भातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक विविधता आणि उपलब्ध भूसंपदा लक्षात घेता नागपूर हे देशातील एक महत्त्वाचे चित्रपट निर्मिती केंद्र बनू शकते, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला. तसेच विदर्भातील चित्रनगरीमुळे मुंबईवरील ताणही कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





