‘आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नागपूर : मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनाच्या जागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. यामुळे या उद्यानातील मोठा वनप्रदेश मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले, सद्यस्थितीत उद्यानातील अनेक वसाहती या ना-विकास क्षेत्रात (एनडीझेड) असून न्यायालयाने त्या जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दूरस्थ ठिकाणी पुनर्वसन केल्यास स्थानिक रहिवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शासनाने विविध पर्यायांचा अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा – कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार
या धोरणानुसार आदिवासी बांधवांचे पुनर्वसन हे त्याच परिसरात करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन उद्यानापासून पाच कि.मी. परिघातील एनडीझेड क्षेत्रात करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी एमआरटीपी कायद्याच्या कलम ३७ (१क क) अन्वये आवश्यक फेरबदलाची सर्व कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्याची अधिसूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नव्या धोरणामुळे आदिवासी बांधव आणि झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन सुलभ होणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मौल्यवान वनक्षेत्र पुन्हा मोकळे होऊन संवर्धनाचा मार्ग मोकळा होणार आहे.





