‘माझ्यासोबत दगा फटका झाला, राजकीय वनवास मिळाला’; पंकजा मुंडेंचं मोठं विधान
![Pankaja Munde said that I was hit with treason, got political exile](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Pankaja-Munde-780x470.jpg)
Pankaja Munde | भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या उपक्रमासाठी बीडच्या गावांमध्ये फिरत आहेत या उपक्रमादरम्यान एका गावात जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणादरम्यान मोठं विधान केलं आहे. आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, वनवासात तुम्ही लोकांच्या स्मरणात राहात नाहीत. तो वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या मनात, हृदयात राहात नाही. मला राजकारणात वनवास झाला. दगाफटका झाला. पण तो कशासाठी झाला? तुम्ही एवढं प्रेम माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. मग मला तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागले, विश्वास ठेवायला लागले. हा माझ्यासाठी झालेला फार मोठा बदल आहे.
हेही वाचा – जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला? महेंद्रसिंग धोनीने सांगितले कारण..
गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझं नाव नव्हतं? विधानसभा, राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं. त्या हिशेबाने लोक माझं नाव घेतात. आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही. त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात. त्यावर मी काहीही करू शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला कुठे जायला आवडेल या निवडीला आता उशीर झालेला आहे. आता माझ्या लोकांना, जे फक्त बीडमध्ये मर्यादित नाहीत, जे माझ्याकडे उमेदीनं पाहातात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले, तर फार मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, पंकजा मुंडेंशी राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा झालेली नाही, असंही त्या म्हणाल्या.