“न्यायालयाबाहेर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करुन निलेश राणेंना…”; नितेश यांच्या वकिलांचा दावा
मुंबई |
शिवसेना पदाधिकाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे अखेर बुधवारी कणकवली न्यायालयात शरण आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी धाकटे बंधू नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारे माजी खासदार निलेश राणे हेही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र आता निलेश राणेंविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचं नितेश राणेंच्या वकीलांनी म्हटलंय.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवल्याचा (कलम १८८) आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी (१८६) निलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ओरोस सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसंदर्भात नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, नितेश राणे न्यायालयातून बाहेर आले तेव्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने रस्ता अडवत कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती पोलीसांनीचं निर्माण केल्याचा आरोप केलाय. न्यायलयाबाहेर परिस्थिती निर्माण करून खोट्या केसमध्ये निलेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचंही देसाई म्हणालेत.
“नितेश राणे ज्यावेळी न्यायालयाच्या बाहेर आले तेव्हा चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी रस्ता अडवला. गाडी अडवली जेणेकरुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. कायदा सुव्यवस्थेची पस्थिती निर्माण होईल असं वातावरण पोलिसांनी निर्माण केलं. अशी परिस्थिती निर्माण करुन अजून काही खोडसाळ प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता. अशा परिस्थितीत आपण बराच वेळ बाहेर राहिलो, उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात गेलो तर अजून काही होण्याची शक्यता असल्याचा विचार करुन सत्र न्यायालयाच्या आदेशाचा विचार करुन नितेश राणे स्वत:हून न्यायालयात हजर झाले,” अशी माहिती देसाई यांनी दिली.
निलेश राणेंनाही अडचणी आणण्याचा प्रयत्न झाल्याचं वाटतं का असा प्रश्न पत्रकारांनी देसाई यांना विचारला. “प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे होते. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर नितेश राणे आले आणि गाडीमध्ये बसले. मी स्वत: तिथे होतो. ते गाडीमध्ये बसून निघाले. त्यावेळी पोलिसांनी रस्ता अडवला. निलेश राणेंनी त्यांना एवढाच प्रश्न विचारला की, तुम्ही कोणत्या कारणाकरता आम्हाला अडवलं ते कारण सांगा. जवळजवळ १० मिनिटं त्यांना अतिशय प्रेमाने विचारुनही ते कोणतंही कारण देऊ शकले नाहीत. त्यामुळेच नाइलास्तव निलेश राणेंनी थोडं रागवून त्यांना विचारलं की तुम्ही मला काय ते सांगा. सांगणार नसाल तर आम्हाला पुढची कायदेशीर कारवाई करावी लागेल. याचाच अर्थ कुठेतरी त्यांच्या संयम सुटून त्यांनी वाईट कृत्य करावं अशापद्धतीने पोलीस त्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत होते. एकंदरित ही पोलिसांची स्ट्रॅटर्जी असल्याचं लक्षात आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली,” असं देसाई यांनी स्पष्ट केलं. “निलेश राणेंवर जो गुन्हा दाखल झालाय तो चुकीच्या पद्धतीने दाखल झालाय. ते सर्व अजामीनपात्र आणि अदाखलपात्र गुन्हे असल्याचं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याबद्दल अजून आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही. पोलीस स्थानकात हजर राहा वगैरे सांगण्यात आलेलं नाही. ज्यावेळेस पोलीस काही सांगतील तेव्हा बघू,” असंही देसाई म्हणाले.