‘महायुतीच्या सरकारने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा पार पडली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील जनतेला आठवण करून दिली की या जिल्ह्याचं नाव पूर्वी औरंगाबाद होतं. ते म्हणाले, या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं जावं अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केलं, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, की महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यंदा ही यंदा दोन विचारधारांमधील लढाई आहे. या निवडणुकीत एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्यांची टोळी आहे. काही लोक असे आहेत जे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्यांना आपला आदर्श मानतात. तर,आमच्या बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. तुम्हाला (जनतेला) असं वाटत नाही की हे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात आहेत.
हेही वाचा – इंद्रायणीनगर, बालाजीनगरमधून अजित गव्हाणे यांना ‘लीड’ मिळवून देण्याची जबाबदारी आमची!
या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं जावं अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केलं. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, ते लोक बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर अवघ्या काही महिन्यांत आम्ही बाळासाहेबांची ती अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तो निर्णय खूप झोंबला. त्यांचे काही सहकारी न्यायालयात देखील गेले. त्यांनी आमच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.





