भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole | राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदू बाबा खरात प्रकरणावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस सरकार हे या प्रकरणाचा राजकीय हेतूने वापर करत असून, “भोंदू बाबा हा प्रत्यक्षात फडणवीस सरकारचाच माणूस बनला आहे,” असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी गोंदिया येथे पत्रकार परिषदेत केला.
गोंदिया येथे पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी आलेल्या पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ‘एफस्टीन फाईल’सारख्या प्रकरणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खरात फाईल’ तयार केली जात आहे. या कथित फाईलमध्ये सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री आणि आमदारांची नावे समोर येऊ शकतात. भोंदू बाबा खरात प्रकरणाची चौकशी अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र अद्याप त्याच्या पत्नीला अटक झाली नाही. तपासाची गती पाहता सरकारची भूमिका संशयास्पद वाटते.
हेही वाचा : ईकेवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका; मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
आरोपींना अटक न करता इतरांवर आरोप करण्याचा सरकारला अधिकार आहे का? फाईल तयार करून दबावाचे राजकारण केले जात आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे, असे पटोले म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की, राज्यातील पोलिस यंत्रणा अपेक्षित वेगाने काम करत नसल्याने जनतेमध्ये अविश्वास निर्माण होत आहे.
दरम्यान, भोंदू बाबा प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक पातळीवरही अस्वस्थता निर्माण झाली आहे. “या प्रकारांमुळे हिंदू धर्माची बदनामी झाली असून, समाजात चुकीचा संदेश गेला आहे,” असे पटोले यांनी नमूद केले. एकूणच, भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.





