‘उमेदवाराला निधी मिळाला म्हणजे जनतेचे प्रेम मिळाले असे नव्हे’; मुरलीधर मोहोळ
![Muralidhar Mohol said that if a candidate gets funds, it does not mean that he gets the love of the people](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Murlidhar-Mohol-1-780x470.jpg)
पुणे | प्रतिनिधी
एखाद्या उमेदवाराला कार्यक्रमात निधी दिला म्हणजे त्याला लोकांचं प्रेम मिळालं असं होत नाही. तुम्ही लोकांसाठी काय आहात आणि त्यांच्यासाठी काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. आम्ही पुणेकर नागरिकांचे मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा भाजप- महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या तीनही उमेदवारांनी विविध माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी ४२ हजारांच्याc निधीही थैली दिली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत मोहोळ यांना विचारले असता मोहोळ म्हणाले, कोथरूडमधील एका कार्यक्रमात कोणाला तरी (रविंद्र धंगेकर) नागरिकांनी निधी दिल्याचे सांगत असला, तर त्यावर मला बोलायच नाही. पण तुम्हाला (रविंद्र धंगेकर) निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळाले असे होत नाही. पण माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. तुम्ही लोकांसाठी काय करणार आहात आणि काय आहात, हे अधिक महत्वाचे आहे.
हेही वाचा – ‘सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी’; मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, भाजपा हा लोकशाही मानणारा असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी मुरलीधर मोहोळ आहे. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला पक्षाने पुणे लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. देशात ४०० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुणे लोकसभेचा विचार करायचा झाल्यास पुण्यात केंद्र सरकारच्या विविध योजनेचा तब्बल अडीच लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. आजवर पुणेकर नागरिक नेहमीच भाजप पक्षाच्या पाठीशी राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.