‘आनंद दिघेंचं झालं, तेच रोशनी शिंदेचं होण्याची भीती’; शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरेगटाकडून धोका
मुंबई : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. दुखापत झालेल्या रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांना लीलावती रूग्णालयात हलवण्यात आले आहे. यावरून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, ज्यावेळी आनंद दिघेसाहेब अॅडमिट होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले. भेटून बाहेर आले त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याचा खुलासा व्हायला पाहिजे. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आत्तापर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याबरोबर काय झालं हे नक्की कोणालाही माहिती नाही.
ठाणेकरांच्या मनामध्ये संशय आहे. तसेच रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरेगटाकडून धोका आहे. त्यामुळे रोशनी शिंदेला संरक्षण मिळावं, अशी मागणी मीनाक्षी शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.