मराठा आरक्षण: सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपळे गुरव येथे एकदिवसीय उपोषण
एकच मिशन मराठा आरक्षण : सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा
पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने सुरु असलेल्या लढ्याला आज पाठींबा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपोषणाला सर्व समाजातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप ग्रामस्थांसोबत एक दिवस लाक्षणिक साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात केली आहे. या लढ्यामध्ये प्रत्येक मराठा बांधव आपल्या परीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठीच पिंपळे गुरव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने या उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठींबा दर्शविला.
या उपोषणाला पिंपळे गुरव येथील सर्वच समाजाच्या नागरिकांच्या वतीने मोठा पाठींबा देण्यात आला. यावेळी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांच्या वतीने ‘एक मराठा, लाख मराठा’, गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ आशा घोषणा दिल्या.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, ‘‘मराठा आरक्षण’’ या विषयावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. त्यासाठी सर्व पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. सरकारने कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. राज्यात सुरू असलेल्या हिंसक घटना अयोग्य असून, सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या आहेत. राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
दरम्यान, पिंपळे गुरव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समजाच्यावतीने आज एकदिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात ग्रामस्थांसोबत सहभागी झालो. ‘गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला’ आणि आंदोलनकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. उपोषणामध्ये सहभागी सर्व मराठा समाजबांधवांचे आभार व्यक्त करतो. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. पोलीस प्रशासनानेही संयमाने आंदोलकांची भावना समजून घ्यावी, असे आवाहनही शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.