मनोज जरांगे पाटील यांचं छगन भुजबळ यांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने मराठा नेते मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमृर्तींना पाठवणं चुकीचं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माणसाने थोडसं भानावर येऊन बोललं पाहिजे. साखळी उपोषण करणारे मुलं, शांततेत आंदोलन करणारी मुलं घरी परतल्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन बदनाम व्हावं म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं. साखळी उपोषण करणाऱ्यांना उचलून नेत आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल बोललो आहेत. ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे असं भुजबळ म्हणाले आहेत पण त्यांचं आरक्षण कसं काय संपणार? आयोगाच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं हक्काचं आहे तेच द्या म्हणतोय. आम्ही कुणाचंही आरक्षण काढा म्हणत नाही.
हेही वाचा – क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टाईम आउटमुळे बाद झाला अँजेलो मॅथ्युज
छगन भुजबळ आता पातळी सोडून बोलू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. निवृत्त न्यायाधीश आले होते चांगली गोष्ट आहे. आम्ही जनता आहोत. न्यायाधीश आले होते त्यांनी माझा जीव वाचवला त्याबद्दल जर भुजबळ असं म्हणत असतील तर मग काय बोलणार? एकमेकांना नमस्कार केला त्यात चुकीचं काय? भुजबळ तर आलेच नाहीत. तेव्हा तर जीव घ्यायला निघाले होते जेव्हा आमच्यावर लाठीचार्ज केला होता. दगडफेक झाली म्हणत असतील तर चौकशी करा. लाठीचार्जचा कट कुणी केला? त्याचाही शोध लावा. उच्चस्तरीय चौकशी करा. दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.