सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांचं राज्य सरकारला खुलं आव्हान; म्हणाले..
![Manoj Jarange Patil's open challenge to the state government after the all-party meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Manoj-Jarange-Patil--780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने आता वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ हवाय. कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन. आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का? असा सवाल केला.
हेही वाचा – तब्बल १२ वर्षांनी वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत विरूद्ध श्रीलंका सामना
आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसं आरक्षण देत नाहीत, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवाय हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत हे सांगावं, वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का? हे सांगा, त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचंय ते पाहू, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.