अर्थसंकल्पावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले,’बेजेटमधून मराठा आरक्षण..’
मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मल सीतारामण यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही. काही लोक बजेट कोलमडलंय किंवा बजेटमधून काही मिळालं नाही असं म्हणतायत त्यांना किंवा अर्थतज्ज्ञांकडे तुम्ही प्रतिक्रिया मागितली पाहिजे. कारण मला त्यातलं काही कळत नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देता येत असेल तर लगेच द्या, असं ते म्हणाले.
हेही वाचा – ‘..तर १२.८८ लाख उद्योजकांनी भारत का सोडला?’ प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारला सवाल
अर्थसंकल्पावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. केंद्र सरकारने गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण या चार प्रमुख घटकांना न्याय दिला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे रोटी, कपडा और मकान देणारा हा अर्थसंकल्प आहे.