‘एक जरी नोंद रद्द झाली तर राज्यातील रस्ते जाम करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
![Manoj Jarange Patil said that if even one entry is cancelled, the roads in the state will be jammed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Manoj-Jarange-Patil-1-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | मराठा नोंदी रद्द करण्याची मागणी केली. देशात केवळ मराठ्यांच्या नोंदी सरकारी आहेत. बाकी कोणाच्या नोंदी सरकारी नाहीत. मुख्यमंत्री साहेब, एकही नोंद रद्द केली तर याद राखा. तुमचे २८८ आमदार पाडले म्हणून समजा, अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवच्या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ तू मराठ्यांच्या नादाला लागू नको. गिरीश महाजनच्या मतदारसंघात जायचे आहे. तो पण लय वळवळ करतोय. त्याच्या मतदारसंघात १ लाख ३६ हजार मराठा मतदार आहेत. तिथले दोन नगरसेवक आले होते. ते म्हणाले, याचा कार्यक्रम लावतो. १९९४ ला आमचे १६ टक्के आरक्षण आमच्या डोळ्यादेखत घेतले. त्यावेळी आम्ही आनंदाने तुम्हाला स्वीकारले. पण आता आमची वेळ आल्यावर तुम्ही विरोध करता.
हेही वाचा – राज्यातील १४ जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
भुजबळच्या नादात तुमच्यावर वाईट वेळ येईल. ओबीसी मतांची गरज आहे म्हणून ओबीसीला जवळ कराल. पण भुजबळचं ऐकून तुम्ही भाजपचं नुकसान करून घेऊ नका. मी लोकसभेला केवळ पाडा म्हणालो. आता नाव घेऊन बोललो तर अवघड होईल. सन्मान घ्यायला दुसऱ्याचा सन्मान करावा लागतो. मराठ्यांची सत्ता येणार आणि त्यावेळी जातीवादी अधिकाऱ्यांचा हिशोब होणार म्हणजे होणार. जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणून बसवले. ज्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी बढती दिली, असं मनोज जरांगे म्हणाले.
राज्यातील एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही. जर एक जरी नोंद रद्द झाली तर रस्ता जाम करा. महाराष्ट्रातील सगळे रस्ते जाम करा. गोरगरीब मराठ्यांना गावखेड्यात अन्याय सुरू झालाय. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो आडवा. काही नाही करता आले तर किमान तिथे जाऊन उभे राहा म्हणजे पुढच्या वेळी होणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.