‘भाजप-संघाचे कान धरून जातनिहाय जनगणना करून घेऊ’; लालूप्रसाद यादव यांची टीका

Lalu Prasad Yadav | इंडिया आघाडीतील पक्ष सातत्याने जातनिहाय जनगनणा करण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपाने ही मागणी म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा काँग्रेसचे प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या जनगणनेला विरोध दर्शवला होता. यावरून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि संघावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
लालूप्रसाद यादव म्हणाले, भाजपा, RSS चे कान पकडून, दंड बैठका करायला लावू आणि जातनिहाय जनगणना करुन घेऊ. यांची लायकी आहे का? जातनिहाय जनगणनेला नाही म्हणायची? यांच्यापुढे आम्ही काही पर्यायच ठेवणार नाही. दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब या सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आता आली आहे.
हेही वाचा – लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन, काय आहेत मागण्या?
जातनिहाय जनगणनेचा इतिहास काय?
भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी जातनिहाय जनगणना सुरु झाली. आपल्या देशात पहिल्यांदा १८७२ या वर्षी जातनिहाय जनगणना करण्यात आली. त्यानंतर १९३१ पर्यंत ही जातनिहाय जनगणना करण्यात आली. भारतात कुठल्या जातीचे किती लोक आहेत याची माहिती इंग्रजांकडे त्यावेळी होती. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. त्यानंतर १९५१ मध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करण्यात आली. त्या आधारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं वर्गीकरण करण्यात आलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे जातनिहाय जनगणना झाली नाही. १९८० नंतर भारतात अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला. त्यावेळी या राजकीय पक्षांचा केंद्रबिंदू जात होता. त्यानंतर जातनिहाय जनगणना करा ही मागणी सुरु झाली. २०११ मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली. मात्र या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. आता पुन्हा जातनिहाय जनगणना करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे.





