‘बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित..’; कंगना रणौतची पोस्ट चर्चेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Kangana-Ranaut-780x470.jpg)
Kangana Ranaut | बांगलादेशात अराजक माजल्याने शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत देशही सोडला आहे. यावरून अभिनेत्री व लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी एक्सवर पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
कंगनाने एक्सवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला यासंदर्भात एक बातमी शेअर केली व लिहिलं. आपल्या सभोवताली असलेल्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताक देशांची मातृभूमी भारत आहे. बांगलादेशच्या मननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटतंय याचा आम्हाला अभिमान आहे, पण जे भारतात राहून विचारत असतात की हिंदू राष्ट्र का? रामराज्य का? तर आता ते स्पष्ट झालंय! मुस्लीम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लीम सुद्धा नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडतंय ते दुर्दैवी आहे. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही रामराज्यात राहत आहोत. जय श्री राम, असं कंगनाने म्हटलं आहे.
हेही वाचा – शेख हसीना भारतात आहेत का? राहुल गांधींच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री म्हणाले..
बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलक निवासस्थानाकडे पोहोचल्याने शेख हसीना यांनी देश सोडला. तिथून त्या बांगलादेशच्या वायूसेनेच्या विमानाने गाझियाबादमधील भारतीय वायूसेनेच्या हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली. शेख हसीना या भारतमार्गे लंडनला जाणार आहेत. भारतीय वायू सेना यामध्ये त्यांची मदत करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.