‘इंदिरा गांधींचं देशासाठीचं योगदान मी नाकारू शकत नाही’; कंगना रणौत
Kangana Ranaut | भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत या आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान त्या त्यांच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ९७६ साली आणीबाणीच्या काळात नेमकी काय परिस्थिती होती, यासंदर्भात भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये इंदिरा गांधी यांची प्रमुख व्यक्तिरेखा कंगना साकारणार आहे. हा चित्रपट येत्या ६सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे एकीकडे चित्रपटाबाबत उत्सुकता असताना दुसरीकडे कंगना रणौत यांनी केलेल्या विधानांची चर्चा होत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इंदिरा गांधींकडून काय शिकायला मिळालं? यावर भाष्य केलं आहे.
कंगना रणौत म्हणाली, मी या चित्रपटासाठी खूप मेहनत केली. मला माहिती होतं की यासाठी एवढा वेळ लागणार आहे. मला असं काही द्यायचं होतं की जे फक्त मनोरंजनासाठी नसेल तर आमच्या पीढीसाठी एक ठेवा असेल. आपण नेहमी आणीबाणीबाबत एकतो. आजकाल संविधानावर खूप चर्चा होते. आणीबाणीत संविधानाची हत्या झाली वगैरे बोललं जातं. हे अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. पण नेमकं माहिती नसतं की तेव्हा काय घडलं होतं.
एक कलाकार म्हणून माझा हेतू वेगळा होता. आणीबाणी झाली, बेकायदेशीर कृत्य झाली, असंवैधानिक पद्धतीने सगळं घडलं वगैरे समजू शकतं. पण तेव्हा नेमकं काय घडलं? एक एवढी लोकप्रिय नेता… आपल्यापैकी कुणीही आपला गर्व, सत्ता याची शिकार होऊ शकतो, ही माझ्यासाठी इंदिरा गांधींच्या आयुष्याकडून मोठी शिकवण आहे, असं कंगना रणौत यांनी म्हटलं.
हेही वाचा – पोलिसांनी आडवं येऊ नये, गृहमंत्री कोण आहे ते बघा; नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी
इंदिरा गांधी म्हणजे अशा व्यक्ती आहेत ज्यांचा जेवढा राग झाला, तेवढंच त्यांच्यावर लोकांनी प्रेमही केलं. अभिनव चंडी, दुर्गा वगैरे विशेषणं त्यांना दिली गेली. आज काही लोक मोदींना रामाचा अवतार मानतात. लोक तेव्हा इंदिरा गांधींना दुर्गेचा अवतार मानत होते. त्यामुळे मोदींना रामाचा अवतार माननं हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. पण एवढं असूनही इंदिरा गांधी देशाच्याच विरोधात गेल्या. हे माझ्यासाठी फार उत्सुकतेचं होतं, असं कंगना रणौत यांनी म्हटलं.
पुपुल जयकर या त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलं आहे. त्यात इंदिरा गांधींनी त्या काळात त्यांचे गुरू कृष्णमूर्तीं यांच्याशी आणीबाणीबाबत केलेल्या संवादाबाबत सांगितलं आहे. कृष्णमूर्ती इंदिरा गांधींना तेव्हा म्हणाले होते की तुम्ही ही आणीबाणी संपुष्टात आणा. हे फार मोठं पाप तुम्ही करत आहात. तर इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या की मी एका फार क्रूर दानवी राक्षसावर स्वार आहे. आता मला थांबता येणार नाही. मी थांबले तर हा राक्षस मला खाऊन टाकेल. या गोष्टीचा माझ्यावर फार परिणाम झाला. मला वाटलं की इथे अशी एक गोष्ट आहे, जी देशाला, येणाऱ्या पिढीला, आपल्या येणाऱ्या नेत्यांना माहिती व्हायला हवी. तसेच, लोक चांगलेही असतात आणि वाईटही असतात. एक कलाकार म्हणून मी इंदिरा गांधींनी या देशाला काय दिलंय ते नाकारून शकत नाही, असंही कंगना रणौत यांनी म्हटलं.