जयंत पाटलांच्या विधानावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली
![Jayant Patil said that Chhatrapati Shivaji Maharaj had asked for ransom](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Jayant-Patil-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती. काँग्रेसने आपल्याला इतकी वर्षे चुकीचा इतिहास शिकवला, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. या विधानावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत सोशल मीडियावर जुंपली आहे.
देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणूस, महाराष्ट्र आणि तमाम हिंदू समाजाचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुट म्हणतात. अब्दाली, तैमूर यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला का? शिव इतिहासकारांनी माध्यमांना सांगितलं की महाराजांनी पत्र दिलं होतं मुघलांचा खजिना आहे, तुम्ही तीन वर्षे युद्ध चालवलं, त्यासाठी इतका खर्च आला. तुम्ही हा खर्च द्या अन्यथा मी स्वारी करेन. शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीसच पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात का? आपल्या बापाला लुटारू म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती.
हेही वाचा – जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मारावबाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल
जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली म्हणजे ते लुटारू होत नाहीत. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तसे महाराजांनी केले नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख कुटुंबात कुणाचा तरी मृत्यू झाला होता, महाराजांनी त्यावर फुली मारली. तिथे जाऊ नका म्हणून सैनिकांना सांगितले. त्यांनी आधी सूरतला नोटीस पाठवून खंडणी मागितली होती. त्यानंतर सूरत लुटण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जयंत पाटलांच्या खंडणी शब्दावरून भाजपाने टीका केली आहे. महाराजांना कधी लुटारू तर कधी खंडणी मागणारे अस म्हणत महाविकास आघाडी कोणाला खुश करू पाहत आहे. खंडणी मिळाली नाही म्हणून सुरत लुटली हे म्हणायला जीभ कशी वळली? माफी मागा..अशी पोस्ट भाजपा महाराष्ट्राने एक्सवर केली आहे.
भाजपच्या टीकेनंतर राष्ट्रवादीनेही ऐतिहासिक दाखला देत प्रत्युत्तर दिलं आहे. होय… ‘खंडणीच’ शब्द. इतिहास काय सांगतो… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती ही १९०६ मध्ये प्रसिद्ध झाली. या चरित्राच्या भाग एकविसाव्यातील पान क्रमांक ३५५ वर ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आढळून येतो. १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुस-यांदा सुरत लुटून पुन्हा स्वराज्याकडे मोर्चा वळवला, त्यावेळी त्या शहरातील रहिवाशांना उद्देशून महाराजांनी एक पत्र लिहिले, सदर पत्रात “तुम्ही प्रतिवर्षी बारा लाख रुपये ‘खंडणी’ बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहरास पुनः लुटीची भीती उरणार नाही!” असा उल्लेख करण्यात आलेला आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.