“सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवा वाद

अकोला : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण करताना त्यांनी भाषणात केलेल्या विधानाने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवली.
“वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” असे बेधडक विधान शिरसाट यांनी भाषणात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची गोची होत असतानाच, हे विधान समोर आल्याने सरकार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आले होते. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना सार्वजनिक मंचावर जबाबदारीने बोलण्याची तंबी दिली होती. तरीदेखील मंत्री वादग्रस्त विधान करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, राज्यात गोरगरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण १२० नवी वसतिगृहे उभारण्यात येणार असून त्यासाठी १,२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. “मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी सर्वप्रथम राज्यातील वसतिगृहे पाहिली. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा चांगल्या दर्जाची असावी, यासाठी हा निर्णय घेतला,” असेही ते म्हणाले.





