सर्व ठरवून केलंय का? अमोल मिटकरींच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे या घटनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. या पुतळ्यावरून सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण तापलेलं असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? या मागचा इतिहास काय आहे? हे सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या मस्तकावर डाव्या भुवईवर एक खोच कोरण्यात आली होती, असा दावा केला जात आहे. काही इतिहासकारांनी दावा केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर, खानाच्या वकिलाने म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर तलवारीने वार केला होता. मात्र जिरेटोपामुळे राजे बचावले. मात्र महाराजांच्या कपाळावर मोठी जखम झाली. ही खुण त्यांच्या मस्तकावर होती. दुसऱ्या बाजूला, अनेक इतिहासकारांनी हे दावे फेटाळले आहेत. दरम्यान, अशीच एक खुण जयदीप आपटेने बनवलेल्या पुतळ्यावरही होती. त्यामुळे आपटे याने जाणून बुजून हा प्रकार केला होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





