‘आजकाल कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही’; इंदुरीकर महाराज यांचं मिश्किल विधान
मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आजकाल कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही, असं मिश्किल विधान इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. ते आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलत होते.
इंदुरीकर महाराज म्हणाले, आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, १००-२०० पतसंस्था, १००-१५० बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार होता येतं. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत.
हेही वाचा – ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ
आता कोणताही पक्ष राहिला नाही. कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच कळेना झालं आहे. पक्ष कोणताही असुद्या आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहेत, असं मिश्किल विधान इंदुरीकर महाराज यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. पेरलेलं पीक उगवणार यांची शाश्वती नाही. १५ दिवस झाले हवामान खाते पावसाची बातमी देईना. शेतकऱ्यांनी शेळ्या विकून सोयाबीन आणि कापसाच्या पिकांची लागणी केली. पण, आता पाऊसच आला नाही. आता माणूस कापसाकडं पाहतो आणि कापसाचे झाड माणसाकडं पाहते, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.