अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजितदादांचा पारा चढला म्हणाले, शिंदे फडणवीस मोठी माणसं, आमच्यासारख्या किरकोळ माणसाचं भाषण ऐकत नाही…
![The budget session, Ajitdada, Para Chadhla said, Shinde Fadnavis is a big man, the speech of the minor man is not united…,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Untitled-design-52-780x470.png)
मुंबईः अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला. सकाळच्या सत्रात शेतकरी प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. तर दुपारच्या सत्रात शिवराय-आंबेडकरांचं प्रलंबित स्मारक, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं विधानसभेतील भाषण ऐकायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या सभागृहात उपस्थित नव्हते. हे पाहून अजित पवारांचा पारा चढला. मी उपमुख्यमंत्री होतो. तेव्हा विरोधी पक्षनेते बोलणार आहेत, हे समजलं तरी मी त्यांचं म्हणणं ऐकायला सभागृहात बसायचो. पण आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना जास्तच काम असतं. शिंदे-फडणवीस मोठी माणसं आहेत. आमच्यासारख्या किरकोळ माणसाचं भाषण ऐकायला ते सभागृहात बसत नाहीत, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला. शेतकरी प्रश्न, कांदा-कापूस दर, छत्रपती शिवराय-बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून महापुरुषांचा सातत्याने अवमान होत असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली.
अजित पवार का चिडले?
सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून वारंवार होत असलेला महापुरुषांच्या अवमान यावर दादा बोलत असताना त्यांनी थेट आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीकडे वळवला. “सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन आपण इथे बसलात. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदयांना खूप काम असतं. त्यामुळे इथे थांबायला त्यांना वेळ नाही. वरच्या सभागृहात जायचंय, असं कारण सांगून ते गेले. पण वरचं सभागृह तर बंदच आहे पण म्हणायला वरच्या सभागृहात गेलेत”.
“ठीक आहे. हरकत नाही. पण आम्ही सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीत असताना विरोधी पक्षनेते बोलत असताना त्यांचा मान ठेऊन त्यांचं भाषण ऐकायचो. पण आता दोघांनाही कामं असतात. आमच्यासारख्या किरकोळ माणसाचं भाषण ऐकायला ते बसत नाहीत”, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या सभागृहातल्या अनुपस्थितीवरुन आपली नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांना फक्त मतांसाठी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब हवेत. त्यांच्या स्मारकांचं भूमीपूजन करुन किती दिवस झाले? काय झालं त्यांच्या स्मारकांचं? सरकार का उत्तर देत नाही?” अशा प्रश्नांच्या फैरी अजित पवार यांनी झाडल्या. “इतक्या दिवस सत्ताधारी पक्षाचे नेते महापुरुषांचा वारंवार अवमान करायचे. गेल्या महिन्यात तो बागेश्वर बाबा नागपुरात आला आणि त्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अवमान केला. सत्ताधाराऱ्यांना का अडवलं नाही, सुनावलं नाही. इतक्या दिवस महापुरुषांवर बोलायचे, आता संतांवर बोलणार का?” म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.