“मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला”; अजित पवारांची दिलगिरी

Ajit Pawar | नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराचा जोर वाढला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेजोगाई येथील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी, काही नेत्यांची शहरं बकाल आहेत. ते सांगत असताना मी एक चुकीचा शब्द वापरला. मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
अजित पवार यांनी नुकतीच अकोला येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, मला काही शेतकऱ्यांनी इथल्या विकासाबाबत वेगळं सांगितलं, त्यात कुठं काही राहिलं असेल तर मला सांगा. आम्ही तुमचेच आहोत. आम्ही तुमचे ते प्रश्न सोडवण्यासाठीच इथे बसलेलो आहोत. आपल्याला विकास साधायचा आहे. जसा आम्ही पिंपरी-चिंडवड व बारामतीमध्ये विकास केला तसाच विकास इथे करायचा आहे.
हेही वाचा : टी-२० वर्ल्डकप २०२६ वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला
जिथे जिथे आमची सत्ता आली तिथे तिथे आम्ही विकास केला आहे. तसाच विकास आपल्याला इथे करायचा आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये एक बकालपणा आहे. मी त्या दिवशी एक चुकीचा शब्द वापरला. मी भिकार असा शब्द वापरला. मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, शहरांमध्ये बकालपणा नसला पाहिजे, या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. आपण आपल्या शहरांचा विकास करू आणि बकालपणा हद्दपार करू, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
प्रचाराला आल्यानंतर मी काहीही थातुरमातुर आश्वासनं देत नाही. आपण कुठेही काहीतरी थातूरमातूर सांगायचं अशी माझी भावना नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या भागात ते करून दाखवलं आहे. त्यामुळे आज आंबेजोगाईमध्ये येऊन सांगतोय. आपणही तसाच विकास करू. परंतु, काही पुढारी येतात आणि सांगतात की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु, त्यांची शहरं बघा, घाण, भिकारXX आणि बकाल शहरं असतात. तिथे सगळीकडे बकालपणा असतो.




