“उद्धव ठाकरेंचे आदेश आहेत म्हणून सहन करतोय,” शिवसेना खासदार हेमंत पाटील स्पष्टच बोलले
मुंबई |
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेते मात्र अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. एकीकडे काही नेते महाविकास आघाडी झाल्याने समाधान व्यक्त करत असताना दुसरीकडे काही नेते मात्र खदखद व्यक्त करत आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखवली असून महाविकास आघाडीत शिवसैनिकांचं नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.
शिवसैनिकांचा वापर केला जात असून फक्त उद्दव ठाकरेंचे आदेश आहेत म्हणून आपण हे सहन करतोय असं हेमंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याव प्रतिक्रिया देताना हेमंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले की, “१०० टक्के शिवसैनिकांचं नुकसान होत आहे. शिवसैनिकांचा वापर केला जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे निधी, पदाधिकाऱ्यांच्या समितीवरच्या निवडी यासंदर्भात शिवसैनिकांना कुठेही लक्षात घेतलं नाहीत. वरिष्ठांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्या आहेत. खरं तर हे जाहीरपण बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेचा एक निष्ठावान शिवसैनिक आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही हे शांतपणे सहन करतोय”.
- अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले…
“लोकांचा जीव वाचवला पाहिजे यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे,” असे अशोक चव्हाण यांनी जालन्यातील सभेत बोलताना म्हटलं.