ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणारः एकनाथ शिंदेंचं आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Abha-780x470.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/abha-card-1-1024x683.jpg)
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत मंत्रालयात आभा आरोग्य कार्डचं वितरण.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
- आरोग्यमंत्री तानाजी सावंत, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले. या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात आली. हे अभियान ३१ ऑक्टोबरपर्यंत राबवले जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Abha-1-1024x683.jpg)
‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’ कार्यक्रम आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘आभा’ कार्डचा बहुविध उपयोग होणार आहे. आयुष्मान भारत हेल्थ कार्डमुळे आरोग्य क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. आजार झाल्यास उपचार घेण्याबरोबरच आजार होऊ नये यासाठी काळजी घेणेदेखील या कार्डमुळे शक्य होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.