“सुशील कुमारला फासावर लटकवा! त्याचे सर्व मेडल काढून घ्या”; सागर राणाच्या कुटुंबाचा आक्रोश
![“Hang Sushil Kumar on the gallows! Take away all his medals ”; The outcry of Sagar Rana's family](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Sushil-Kumar-PTI.jpg)
नवी दिल्ली |
कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी अखेर सुशील कुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. पीडित सागर राणाच्या कुटुंबाने याप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी केली असून सुशील कुमारला कठोर शिक्षा केली जावी अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखींच्या माध्यमातून तपासावर प्रभाव पाडू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे. सागर राणाच्या आईनेही संताप व्यक्त केला असून गुरु म्हणण्याची त्याची पात्रता नसल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशील कुमार आणि सह-आरोपी अजय यांना रविवारी सकाळी अटक केली. हत्येनंतर गेल्या २० दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. न्यायालयात हजर करण्यात आलं असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली क्राइम ब्रांच याप्रकरणी पुढील तपास करणार आहे.
“ज्याने माझ्या मुलाची हत्या केली तो गुरु म्हणण्याच्या पात्रतेचा नाही. त्याने जिंकलेले सर्व मेडल काढून घेतले पाहिजेत. पोलीस योग्य तपास करतील असं आम्हाला वाटतलं, पण सुशील कुमार आपला राजकीय प्रभाव वापरु शकतो,” असं सागर राणाच्या आईने फाशीची मागणी करताना म्हटलं आहे. सागर राणाचे वडील अशोक बेगमपूर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असून यावेळी त्यांनी सुशील कुमारच्या गुन्हेगारी संबंधांचाही तपास करण्याची मागणी केली आहे. “आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत. फरार झाल्यानंतर तो कुठे होता? त्याला आसरा कोणी दिला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या गँगस्टरसोबत त्याचे संबंध आहेत. त्याला फासावर लटकवलं पाहिजे म्हणजे लोकांना धडा मिळेल आणि आपल्याच विद्यार्थ्याची हत्या करण्याआधी विचार करतील,” असं अरुण यांनी म्हटलं आहे. सागर राणा हा सुशील कुमारला आपला गुरु मानत होता. सुशील कुमारच्या पत्नीच्या नावे नोंदणी असलेल्या ठिकाणी तो राहत होता. दरम्यान सागरच्या मामाने स्थानिक राजकीय नेत्यांकडून समर्थन न मिळाल्याने नाराजी जाहीर केली आहे. “हरियाणा आणि भाजपा सरकारने मृत्यूनंतर साधा शोक व्यक्त केला नाही. सागर हरियाणाच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष प्रकाश धनकड यांच्या परिसरातील होता, पण त्यांनी साधा फोन केला नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
वाचा- वुहानमधूनच करोनाचा फैलाव? प्रयोगशाळेतील तीन संशोधक पडले होते आजारी; रिपोर्टमधून खुलासा