असंगाशी संग..अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी; भाजप नेत्याचं विधान

Ajit Pawar | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजप नेत्यानीही आपली नारीजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सार काही आलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली, असंही ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.
हेही वाचा – प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच २२ वर्षानंतरही सही रे सही नाटकाची यशस्वी घौडदौड; भरत जाधव
दरम्यान, गणेश हाके यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,
हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले. महायुतीमध्ये आम्ही काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरुन काम करतोय. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे यांच्या पोटात दुखतय. वरिष्ठ पातळीवर विधान होतील तेव्हा जशास तसं उत्तर दिली जातील. आपले आमदार आहेत तिथे भाजपला किती मतं मिळाली? याचे हाकेंनी आत्मचिंतन करावं. उगीच अशी विधाने करुन गोंधळ निर्माण करु नये असे सुरज चव्हाण म्हणाले.





