सर्वोच्च न्यायालयात लढाई! परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी
![Fight in the Supreme Court! Hearing on Parambir Singh's petition today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/param-bir-singh1.jpg)
मुंबई |
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब टाकला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या या पत्रानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत असून, परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या रिपोर्टवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरले. विरोधकांकडून वाझे प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रं देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप सिंह यांनी याचिकेत केलेला आहे. सिंह यांनी याचिकेत तीन मागण्या केलेल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत केलेल्या आहेत. त्यामुळे याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
देशमुख-ठाकरे यांच्यात चर्चा
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंगळवारी झालेल्या बैठकीत दोघांमध्ये फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टचा हवाला देत सरकारवर गंभीर आरोप केले. या रिपोर्टसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.
वाचा- पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी; नांदेडच्या भोकर जिल्हा न्यायालयाचा निकाल