‘मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान पाठवणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![Eknath Shinde said that he will send a special plane for the students of Maharashtra stuck in Manipur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Eknath-Shinde--780x470.jpg)
मुंबई : मणिपूरमध्ये मागील आठवड्यात भडकलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या ५४ वर पोहचली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी अडकले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारने पाऊले उचलली असून, मणिपूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
लवकरच हे विमान विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडेलवरून दिली आहे. सीएमओच्या ट्विटरवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून, त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा – ‘ISIS तुम्हाला दहशतवादी संघटना वाटत नसेल तर तुम्हीच दहशतवादी’; कंगना रनौत
राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली आहे. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.