लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी मुदत वाढणार

मुंबई: राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र यात बाेगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप अर्ध्याही लाभार्थी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी केवळ ८० लाख महिलांचेच ईकेवायसी पूर्ण झाले आहे, त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महिला व बालविकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सध्या दोन कोटी ४० लाख महिला लाभ घेत आहेत. १८ सप्टेंबर महिन्यापासून या महिलांचे ईकेवायसी करण्यास सुरुवात झाली. मात्र कधी ओटीपी येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नतेतील अडचणींमुळे महिलांना ईकेवायसीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ८० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरआधी ईकेवायसी पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यासाठी जनजगागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांचे ईकेवायसी पूर्ण करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा – ‘न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक’; सरन्यायाधीश भूषण गवई
मुदत वाढविण्याबाबत तत्कालीन परिस्थीती पाहून निर्णय – अदिती तटकरे
ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी १८ सप्टेंबरपासून ईकेवायसी करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन ५ लाख ऐवजी प्रतिदिन १० लाख करण्यात आली आहे. दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढलेली क्षमता पाहता १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, काही प्रमाणात लाभार्थ्यांची ईकेवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
विधवा तसेच घटस्फोटीत महिलांना ईकेवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे. पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ईकेवायसी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत. या महिलांची समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी २६ लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबविण्यात आले होते. या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर २० लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहेत. मात्र अद्याप त्यांची ओळख न पटल्याने त्यांचे पैसे थांबविण्यात आले आहेत.
विविध विभागांत सात हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीणचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. या महिला कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून पैसेही वसूल करण्यात येणार आहेत. १२ हजार पुरुष लाभार्थी यात सापडले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





