Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका, “निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर…”

Devendra Fadnavis : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेतील बोस्टन या ठिकाणी आहेत. ब्राऊन विद्यापीठाच्या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला आणि निवडणूक आयोगाने तडजोड केल्याची बाब भाषणात अधोरेखित केली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं दिसून आलं. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. असं घडणं केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटं लागतात. जर ही वेळ लक्षातघेतली तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असं कुठेही घडल्याचं पाहण्यास मिळालं नाही.”

राहुल गांधी म्हणाले की “आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं होतं की मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी कायद्यातही बदल केला त्यामुळे तुम्हाला वाटलं, कुणालाही वाटलं तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट झालं आहे” असाही आरोप राहुल गांधींनी केला. या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा –  अश्विनी बिद्रे प्रकरणातील मोठी अपडेट समोर; आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधींना उत्तर

“राहुल गांधीनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते बदनामी करत आहेत ही बाब निंदनीय आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना आपल्याच देशाची बदनामी विदेशात जाऊन करत असतील तर त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की ते नेमका कुणाचा अजेंडा चालवत आहेत?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “माझा राहुल गांधींना सल्ला आहे की त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे. जगभरात फिरुन आणि भारताची बदनामी करुन त्यांची विश्वासार्हता वाढणार नाही. जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील. पण त्याऐवजी भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललं आहे. महाराष्ट्रात हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. त्यांनी भारताची बदनामी करणं बंद करावं” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button