अश्विनी बिद्रे प्रकरणातील मोठी अपडेट समोर; आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर…

Ashwini Bidre Case : सहाय्यक पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने ‘ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरूपाची होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी फसवणूक करून, नंतर तिचा जीव घेण्याचे कृत्य समाजाला धक्का देणारे आहे,’ असे नमूद केले आहे. तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांवर पुरावे नष्ट करणे, माहिती लपवणे आणि गुन्हेगाराला मदत करणे अशा आरोपांखाली खटला चालवण्यात आला होता. या दोघांनी शिक्षेची मुदत आधीच पूर्ण केल्याने त्यांची सुटका होणार आहे.
हेही वाचा – PCMC: महापालिकेच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत पंप जोडणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाई
काय आहे नेमके अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण?
अश्विनी बिद्रे यांचा 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती झाली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली याठिकाणी झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली.
अश्विनी आणि अभय दोघेही विवाहित होते. पण अभयने अश्विनीला आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनीने आपल्या पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहते.
यानंतर अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. पण कुरुंदकरला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर न झाल्याने पोलीस खात्याने पत्र पाठवलं. त्यावेळी अश्विनी यांच्या कुटुंबाला त्या गायब झाले आणि त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती. अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल ९ वर्षानंतर लागला आहे.