देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नाही, कुणीही…”

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला असतानाच, मंगळवारी मतदान होत असलेल्या नगरपालिका वा नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाच्या ५०च्या आसपास ठिकाणची निवडणूक कायदेशीर मुद्द्यांवर पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर आली आहे. बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटणसह १० पालिकांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली. या सर्व पालिकांमध्ये आता २० डिसेंबरला मतदान होईल. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच शहाजी बापू पाटील यांच्या कारखान्यावर जी धाड पडली त्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.
शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा पडला याबाबतची मला कल्पना नाही. पण कुणी सत्तेत आहे किंवा नाही यावर काही रेड ठरत नसते. आमच्याही कार्यकर्त्यांचं नाव आलं कशात तर त्याच्यावरही छापा पडतो. अनेकवेळा माझीही गाडी तपासली जाते, त्यामुळे अशा बाबतीत सत्ता किंवा विरोधक असं काही नसतं.
हेही वाचा – नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला
एकनाथ शिंदे आणि माझी भेट झालेली नाही कारण मी रात्री उशिरा आलो आणि मी एकनाथ शिंदेंच्या आधी चाललो आहे. त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही. उद्या भेट होईल, आम्ही दोघंही प्रचारात मग्न आहोत. मला लवकर निघायचं आहे त्यामुळे आमची भेट झाली नाही. एकनाथ शिंदे तयार व्हायचे आहेत. माझ्या सभा लवकर आहेत. त्यामुळे आम्ही भेटलो नाही इतकंच आहे बाकी कारण नाही.
निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं कधीच आजवर झालेलं नाही. कुणाचा सल्ला निवडणूक आयोग घेतं आहे आणि कुठला कायदा काढतं आहे याची मला कल्पना नाही. पण मी जेवढा कायद्याचा अभ्यास केलाय त्यानुसार आणि अनेक वकिलांशी बोललो त्यांचं हे मत आहे की अशा पद्धतीने एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूक पुढे ढकलता येत नाही. निलंग्यात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती. एकाचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला. कोर्टानेही तो फॉर्म डावलला. कुणीतरी पार्टी केलं म्हणून निवडणूक पुढे ढकलली हे चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीर रित्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे. त्या उमेदवारांवर हा अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आता १५ ते २० दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा हे चुकीचं आहे. आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करु असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग स्वायत्न संस्था आहे. पण जो निर्णय घेतला आहे तो मान्य करावा लागेल पण हा निर्णय चुकीचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.




