#CycloneTauktae: गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा!
मुंबई |
तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. याशिवाय देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Gujarat: Prime Minister Narendra Modi holds a review meeting in Ahmedabad, to assess the situation and damage caused by #CycloneTauktae. CM Vijay Rupani also present among other officials.
PM conducted an aerial survey of cyclone-affected areas of Gujarat & Diu, earlier today. pic.twitter.com/Qtjme5aCSr
— ANI (@ANI) May 19, 2021
कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या तौते चक्रीवादळामुळे किनारी भागात वादळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमधला वीजपुरवठा, रस्तेवाहतूक विस्कळीत झाली. मात्र, गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातल्या गावांना बसला आहे. चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाला, तेव्हा किनारी भागातल्या एकूण २४०० गावांमधला वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले आहेत. या भागातले तब्बल १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० हजार झाडं उन्मळून पडली आहेत. तब्बल १६ हजार ५०० घरांचं नुकसान झालं असून किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं.
Rs 2 lakh ex gratia for the next of kin of the dead and Rs 50,000 for the injured due to Cyclone Tauktae would be given to all those affected across India. PM also takes stock of COVID-19 situation in Gujarat: Prime Minister's Office
— ANI (@ANI) May 19, 2021
दरम्यान, गुजरातसोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना देखील तौते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे देशात ज्या ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला आहे, तिथे मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या मदतनिधीची देखील घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.