#Covid-19: “नेतृत्व आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती उद्भवली”, RBI माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचं टीकास्त्र
![# Covid-19: "This situation arose due to lack of leadership and foresight", former RBI Governor Raghuram Rajan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/raghuram-rajan.jpg)
नवी दिल्ली |
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलं आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. दिवसाला ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून ३ हजार रुग्ण करोनामुळे दगावत आहे. करोनामुळे भारतात विदारक स्थिती निर्माण झाली. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या संपूर्ण स्थितीसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
‘मागच्या वर्षी आलेल्या करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्व शांत बसले होते. जर हे सावध असते आणि समजलं असतं की करोना अजून संपला नाही. जगात काय सुरु आहे यावर लक्ष केंद्रीत केलं असतं. ब्राझीलचं उदाहरण समोर होतं. करोना अधिक प्रभावीपणे पुन्हा येत आहे. मात्र नेतृत्वाचा अभाव आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती ओढावली आहे.’ असं रघुराम राजन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ‘मागच्या वर्षी करोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याने सर्वांना वाटलं आता करोनाचा वाईट काळ संपला. वाईट परिस्थितीतून बाहेर निघालो आणि अर्थचक्र पुन्हा सुरु केलं. मात्र यामुळे आपलं नुकसान झालं’, असंही त्यांनी पुढे सांगितलं. ‘करोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारतानं लोकसंख्येच्या तुलनेत व्हॅक्सिन तयार केल्या नाहीत. त्यांना वाटलं अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण करोनाला हरवलं आहे. लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु करु शकतो’, या विचारामुळेच करोना वाढल्याचा त्यांनी सांगितलं. मार्च आणि एप्रिलनंतर करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत.
वाचा- “पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” हिंसाचारावर खासदार संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया