#CoronaVirus: राहुल गांधी यांची अमित शहांवर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/ahul-amit-1.jpg)
करोनाच्या मुद्दय़ावर विविध तज्ज्ञांकडून मते जाणून घेणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करताना शाब्दिक कोटी केली आणि तीही मिर्झा गालिबचा शेर वापरून! सीमांच्या रक्षणाचे वास्तव सगळ्यांना माहिती आहे, अशी टिप्पणी राहुल यांनी केली.
सब को मालूम है ‘सीमा’ की हकिकत लेकीन, दिल के खुश रखने को, ‘शहा-यद’ ये ख्याल अच्छा है.. असे ट्वीट राहुल यांनी केले. गांधी सातत्याने समाजमाध्यमाचा आधार घेऊन आपली मते व्यक्त करत असले तरी त्यांनी कधी शेरोशायरीचा आधार घेतलेला दिसला नाही. मात्र, या वेळी त्यांनी ‘शायद’ या शब्दावरून ‘शहा-यद’ अशी कोटी करत शहांना लक्ष्य बनवले.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे ‘बिगूल’ वाजवताना रविवारी आभासी सभेत अमित शहा यांनी सीमांचे रक्षण करण्यात भारत यशस्वी झाला असल्याचे मत व्यक्त केले होते.
अमेरिका व इस्रायल या देशांनंतर स्वत:च्या सीमा सुरक्षित राखण्यात यशस्वी झालेला देश म्हणजे भारत, असे शहा म्हणाले होते. मात्र, शहांच्या या विधानात सध्या चीनशी सुरू असलेल्या सीमासंघर्षांवर कोणतीही टिप्पणी नव्हती. त्याचा संदर्भ घेत राहुल यांनी सीमारेषांवरील वास्तव सगळ्यांनाच माहिती असल्याची टीका केली. लडाखमध्ये चीनशी असलेल्या संघर्षांची माहिती देशाला केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.